“हे शब्देविण संवादिजे | इंद्रिया नेणता भोगिजे |” या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीत संवादाचे अत्यंत सूक्ष्म आणि गूढ स्वरूप उलगडलेले आहे. संवाद म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नव्हे; तो माणसाच्या अंतर्मनाशी, जाणिवांशी आणि स्व-रूपाशी साधला जाणारा एक सखोल अनुभव आहे. दैनंदिन व्यवहारात आपण बाह्य जगाशी शब्दांच्या माध्यमातून संवाद साधतो. परंतु आत्मशोधाच्या प्रवासात शब्दांची मर्यादा जाणवते आणि तेथे अनुभव, संवेदना आणि अंतर्ज्ञान यांची भाषा अधिक प्रभावी ठरते.
अशा प्रकारचा स्वसंवाद हा केवळ विचारांचा प्रवास नसून आत्मभान, चिंतन आणि अनुभूती यांचा शोध असतो. जाणिवेच्या पातळीवर सुरू झालेला हा संवाद नेणिवेच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो आणि तेथून जीवनाच्या अधिक व्यापक अर्थांचे दर्शन घडवतो. त्यासाठी शब्दांच्या पलीकडील नवनीत तत्त्व अलगद टिपावे लागते.
प्रस्तुत पुस्तकात अशाच विविध स्तरांवर संवाद अनुभवणाऱ्या आणि जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत तन्मयतेने कार्यरत आहे. काहींनी आपल्या व्यवसायाला किंवा ध्येयाला जीवनकार्याचे स्वरूप दिले आहे, तर काहींनी विशिष्ट विचार, मूल्ये आणि संकल्पनांशी सर्जनशील संवाद साधत जीवन समृद्ध केले आहे.
संवाद कोणत्याही स्वरूपाचा असो, त्याचा अंतिम उद्देश ‘आपलाचि आपणाशी’ होणारी भेट हा आहे. आत्मसंवादाच्या या प्रवासाला दिशा देणारे आणि चिंतनाला प्रेरणा देणारे हे पुस्तक वाचकांसाठी एक अर्थपूर्ण अनुभव ठरेल.






Reviews
There are no reviews yet.